jalna news, हजार रुपयांपासून सुरुवात आता ३० लाखांची उलाढाल,जालन्याच्या संजीवनी ताईंची प्रेरणादायी गोष्ट - jalna news mata super women success story of sanjeevani jadhav who started her own amla products business

जालना : आज चांगलं इंग्रजी बोलणाऱ्या संजीवनी जाधव यांच्याकडे पाहून यांचं शिक्षण अवघं ९वी पास असेल असं वाटतच नाही. ९वी पास नंतर शाळा सुटली ती सुटलीच. वयात आल्यावर लग्न झालं आणि चूल आणि मुल एवढंच जीवन झालं. पती जालन्यातील एका कंपनीत कामाला. जालन्या सारख्या शहरात भाड्याच्या घरात राहायचं, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडायची यासाठी खूप पैसा लागतो आणि तो कमी पडतोय याची जाणीव संजीवनी यांना सतत होत होती. संजीवनी यांनी आपल्याला आर्थिक स्थैर्य हवं आणि आर्थिक स्त्रोत सुध्दा मजबूत हवा हा विचार करून घरच्या घरी काही उद्योग करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं.

संजीवनी जाधव यांनी जालना येथील कृषी विज्ञान केंद्रातील आवळा प्रक्रिया प्रशिक्षणात भाग घेतला आणि आवळ्यापासून सरबत, सुपारी, लोणचं, मुरब्बा, ज्यूस, कँडी, मुखवास असे अनेक पदार्थ कसे बनतात याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी घरगुती उद्योग करायचं ठरवून त्या कामाला लागल्या. बाजारात उपलब्ध असलेला आवळा विकत घेऊन भाड्याच्या घरातच त्यांनी घरच्या घरी १ किलो, ५ किलो, १० किलो अशा प्रमाणात आवळा सुपारी, कँडी, सरबत बनवायला सुरुवात केली.

प्रवाशांच्या लाडक्या लालपरीच्या चाव्या महिलांच्या हाती, बँकेतील सेल्स मॅनेजरची नोकरी सोडून ती ड्रायव्हिंग सीटवर
तयार पदार्थांच्या विक्रीसाठी त्या स्वतः स्टॉल लावायला लागल्या. यात्रेत, बाजारात, धार्मिक कार्यक्रमात टेबल खुर्ची टाकून तिथे हे पदार्थ विकायला सुरुवात केली आणि जालनाकरांना त्यांचे आवळ्याचे विविध पदार्थ आवडायला लागले. हा व्यवसाय वाढू लागला. व्याप वाढायला लागताच त्यांनी २ महिलांना रोजगार दिला. विक्रीसाठी, मार्केटिंग साठी २ मुलं ठेवली. बाजारातून मागणी वाढू लागली आणि बघता बघता ऑर्डर संपून माल घेणाऱ्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली.

व्यवसाय वाढीसाठी त्यांनी ४ लाखाचं कर्ज घेतलं आणि संजीवनी जाधव यांच्या व्यवसायाच्या भरभराटीला सुरुवात झाली. व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या तशा संजीवनी ताईंनी मदतीसाठी अजून २ महिलांना रोजगार तर दिलाच सोबतच आवळा प्रक्रियेचं प्रशिक्षण सुध्दा दिलं. आता त्यांच्याकडे ५ महिला प्रक्रियेची कामं करतात, तर २ मुलं वितरणाची कामं करतात. त्यामुळे आता स्थानिक बाजारपेठेसोबत इतर जिल्ह्यात त्यांची विक्री वाढायला लागली आणि आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून घरगुती चालू केलेला आवळा प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल तब्बल २५ ते ३० लाखांवर येऊन ठेपली आहे.

भाड्याच्या घरातून त्या स्वतःच्या घरात राहायला आल्या. तिथेच त्यांनी त्यांचा व्यवसाय वाढवला. आता ५ महिला, २ मार्केटिंगची मुलं कामाला आहेत. व्यवसाय वाढल्याने त्यांनी जालना औद्योगिक वसाहतीत भाड्याच्या जागेत आपला व्यायसाय स्थलांतरित केला आहे. त्यांच्या जवळच त्यांनी एक भूखंड खरेदी केला असून काही दिवसात स्वतःच्या जागेत त्यांचा व्यवसाय स्थलांतरित होणार आहे. या उद्योगात त्यांनी आपल्या पदार्थांची गुणवत्ता राखली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आवळा कँडी, लोणचं, पावडर, मुरांबा, सुपारी, ज्यूस, मुखवास, मसाला सुपारी, चॉकलेट असे कित्येक प्रकार त्यांनी तयार केले.

करुन दाखवलं…, सुखसोई मिळणारी नोकरी सोडत ग्रामविकासाचा ध्यास, २९ वर्षाच्या तरुणीनं गावाचं चित्र पालटलं
त्यांची एक मुलगी सध्या दिल्लीत रिसर्च करत असून दुसरी मुलगी सिव्हिल इंजिनिअर आहे. त्यांचा मुलगाही चांगलं शिक्षण घेत आहे. स्वतःच घर, मुलांचं उच्च शिक्षण, आता MIDC मध्ये स्थलांतरित झालेला व्यवसाय अशी त्यांची उत्तुंग झेप आहे. आवळा प्रक्रिया करता करता आता त्या जांभूळ, आवळा, मोसंबीपासून वाईन बनवून एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकायच्या तयारीत आहेत.

आपल्या परिवाराच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने घरघुती व्यवसाय म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायाने संजीवनी जाधव आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. व्यवसायाबरोबरच मुलींच्या आणि मुलाच्या शिक्षणावर देखील त्यांनी लक्ष दिलं.

मिटकॉन सारख्या आयोजित कार्यक्रमात संजीवनी जाधव महिलांना आवळा प्रक्रियेचे धडे देतात. त्यांच्याकडे कामासाठी आलेल्या महिलांना त्या प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदतही करतात. त्यामुळे कुटुंबासाठी पदर खोचून व्यवसायात उतरलेल्या संजीवनी यांची ही मेहनत अनेक महिलांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

Source link

By jaghit