heavy rain in maharashtra, परतीच्या पावसाने घात केला, शिवारात उगवलेलं सोनं अन् शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात वाहून गेली - heavy rain in maharashtra causes major crop losses onion and soybean get rotten in flood water in maharashtra

Rohit Dhamnaskar | Maharashtra Times | Updated: 21 Oct 2022, 10:57 am

Heavy Rain in Maharashtra | सध्या राज्यातील विविध भागांमध्ये परतीचा पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाचा जोर प्रचंड असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला याचा मोठा फटका बसताना दिसत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस थांबेल, असा अंदाज होता. मात्र, आता महिना संपत आला तरी ग्रामीण महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुरदसृश परिस्थिती निर्माण होऊन शेतांमध्ये पाणी साचत आहे. यामुळे काढणीला आलेली पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत अक्षरश: मातीमोल होताना दिसत आहेत. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. काढणीला आलेली पिकं विकून दोन-चार पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शिवारात उगवलेलं सोनं पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाची दिवाळी काळोखी ठरण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जोर धरताना दिसत आहे. मात्र, सरकारी मदत पोहोचेपर्यंत हवालदिल झालेले शेतकरी काय करणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

 

परतीच्या पावसाने घात केला, शिवारात उगवलेलं सोनं अन् शेतकऱ्यांची स्वप्न पाण्यात वाहून गेली

परतीचा पाऊस

राज्यात सध्या सर्वत्र सोयाबीन काढण्याची लगबग सुरू आहे. जवळपास ४० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी केली आहे. मात्र उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक हे शेतातच पडून आहे. कारण मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीसाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सततच्या पावसाने उभ्या सोयाबीनच्या पिकाला कोंब फुटू लागले आहेत. शेतातील सोयबीनसह कापसाचं मोठं नुकसान झालं आहे.

अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर

पावसामुळे हिंगोलीतील आसना नदीला पूर आला आहे. नदीच्या या पुरामुळे शेकडो एकर शेतीत पाणी घुसले असून शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्याचबरोबर मदत जाहीर करूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांना आता तरी जाग येईल का…? असा सवाल शेतकरी करू लागले आहेत. सध्या राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असे वक्तव्य कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्यामुळे शेतकऱ्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. परंतु हे सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप होत आहेत.

पीकं पाण्यामुळे वाया

हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कापणी केलेले सोयाबीनचे पीक पाण्यावरती तरंगत आहे. शेतात पाणीच पाणी असल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यातूनही पाणी वाहू लागले आहे. उसनवारीचे पैसे घेऊन आधी दुबार पेरणी केली आणि आता तोंडाशी आलेला घास हिरावण्याच्या मार्गावर आहे. एकही दिवस पाऊस उघडीप घेत नसल्यामुळे सोयाबीनची कापणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. सोयाबीन पीक आणखी काही दिवस शेतातच ठेवल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

राज्यात अतिवृष्टी

अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतातील पिकं पूर्णपणे झोपून गेली आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसाने सगळीकडेच दाणादाण उडविली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील शिल्लक पिकांचा चिखल होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना दोन टप्प्यात शासनाने नुकसान भरपाई दिली असली तरी शेतीचे यंदा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजीपाला पिकाला देखील या पावसाचा फटका बसल्याने भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

साठवलेला कांदा पाण्यात

अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून मोठ्या कष्ट्याने वाढवलेली पिके डोळ्यांदेखत पाण्याखाली गेली आहेत. मात्र या पावसाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसला, असं नाही. कोपरगाव तालुक्यात याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. टाकळी रस्त्यालगत काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कांदा साठवून ठेवला होता. बुधवारी मध्यरात्री कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्यामुळे या शेडमधील व्यापाऱ्यांचा कांदा पाण्यात वाहून गेला. परिणामी व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं.

डोळ्यांदेखत पीक पाण्यात

Maharashtra Heavy Rain | हवामान बदलामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचा हंगाम लांबला आहे. परतीचा पाऊस शेतकऱ्यांना मोठा तडाखा देताना दिसत आहे. दिवाळी तोंडावर असताना शेतकऱ्यांना या अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. काढणीला आलेली पिकं विकून दोन-चार पैसे मिळतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शिवारात उगवलेलं सोनं पाण्यात वाहून गेल्याने बळीराजाची दिवाळी काळोखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काही निर्णायक पाऊस उचलणार का, हे पाहावे लागेल.

कांद्यांचे मोठे नुकसान

कोपरगाव तालुक्यात टाकळी परिसरात एका गोदामात कांदा साठवून ठेवण्यात आला होता. मात्र, अतिवृष्टीमुले या गोदामात पाणी शिरले आणि होत्याचे नव्हते झाले. पाण्याचा प्रवाह थांबल्यावर उरलेला कांदा पाण्यावर तरंगत होता. भिजलेला हा कांदा वाया गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठं नुकसान झालं. यामुळे गुरूवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलावही बंद ठेवण्यात आले होते. टाकळी रोडवरील या व्यापाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचाही तडाखा बसला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा वाहून गेला होता.

कांदा पाण्यावर तरंगताना दिसत होता

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा वाहून गेला. तसंच सततच्या पाण्यामुळे साठवून ठेवलेला कांदा सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे पैसे कसे द्यायचे, अशी चिंता आता या व्यापाऱ्यांना सतावत आहे. काहींनी स्वतःचे पैसे उपलब्ध करून शेतकऱ्यांना बिले दिली. मात्र त्यांचा कांदा वाहून गेल्याने तोटा झाला आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या संकटामुळे व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी गुरूवारी सकाळी या नुकसानीची पाहणी केली आणि सर्व कांदा व्यापाऱ्यांना धीर दिला.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: