banana farmer jalgaon news, Jalgaon News: शेतात 'सोनं' उगवलं, बळीराजा मालामाल, पण मेहनत करणाऱ्या कामगारांना विसरला नाही - jalgaon news banana farmer earns crore of rupees

Authored by किशोर पाटील | Maharashtra Times | Updated: 31 Oct 2022, 12:27 pm

Jalgaon News: आपल्या मालकाने गावकऱ्यांसमोर केलेल्या या सन्मानामुळे शेतात काम करणारे कामगारही भारावले आहेत, स्वप्नातही विचार केला नव्हता की, असा सर्व लोकांसमोर सत्कार होईल, त्यामुळे या सत्काराचा, सन्मानाचा मोठा आणि अविस्मरणीय आनंद असल्याच्या भावना कष्टकरी कामगार व्यक्त करतात. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांची, शेतकऱ्यांची उपस्थिती असल्याचं पाहायला मिळालं.

 

Jalgaon News: शेतात ‘सोनं’ उगवलं, बळीराजा मालामाल, पण मेहनत करणाऱ्या कामगारांना विसरला नाही
एकीकडे केळी उत्पादक शेतकरी सततच्या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आहे. सीएमव्ही व्हायरसने हतबल झाला आहे. तर दुसरीकडे याच परिस्थितीचा सामना करत योग्य व्यवस्थापन, नियोजन आणि मार्गदर्शनातून शेती करत जळगाव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मोठ आदर्श घालून दिला आहे. भडगाव तालुक्यातील वाडे गावातील शेतकऱ्याने भाडेतत्वावर ३० एकर शेतीत तब्बल दीड कोटी रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे. कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न मिळाल्याचा अनोखा आनंदही या शेतकऱ्याने साजरा केला आहे. उत्पन्न हे शेतात राबणाऱ्या कष्टकरी कामगारांमुळे मिळालं, अशी भावना मनात ठेवून मोठा कार्यक्रम घेवून कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करत, त्यांच्या कुटुंबीयांना कपडे देत, कामगारांसोबत खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करत कृतज्ञता जोपासली आहे.

केळीच्या टीशू कल्चर रोपांची लागवड

भडगाव तालुक्यातील वाडे गावात रविंद्र हरी पाटील यांची शेती आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. या बरोबरीने त्यांनी ३० एकर शेती भाडे तत्वावर करायला घेतली. या संपूर्ण शेतीत त्यांनी ५० हजार केळीच्या टीशू कल्चर रोपांची लागवड केली. लागवडीचं तंत्र, योग्यवेळी खतं, कीटकनाशकं तसंच जैन इरिगेशन कंपनीचे मार्गदर्शन या जोरावर रविंद्र पाटील यांनी या ३० एकरात तब्बल दीड कोटी रुपयांचं उत्पन्न घेतलं.

केळीच्या शेतीतून मोठं उत्पन्न

शेतीतील कामगारांनी वेळोवेळी या केळीच उत्पन्न यावं यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली, हे माझं एकट्यांच यश नाही, तर या उत्पन्नामागे शेतात राबणाऱ्या कामगराचाही मोलाचं वाटा आहे, त्यांच्या कष्टामुळेच हे उत्पन्न मिळालं अशी त्यांची भावना आहे. ही भावना मनात ठेवून रविंद्र पाटील यांनी कामगारांप्रती कृतज्ञता जोपण्यासाठी दिपोत्सव अशा मोठ्या कार्यक्रमाचं गावात आयोजन केलं, यात मान्यवरांच्या हस्ते कामगारांचा सत्कार करण्यात आला.

माझ्या कामगारांमुळे कोट्यधीश झालो

तसंच त्यांच्या कुटुंबियांना साडीचोळी भेट देण्यात आली. तसंच फक्त कामगारांच नव्हे, तर संपूर्ण गावाला गोड जेवणाची पंगतही देण्यात आली. हा कामगार माझा परिवार आहे, आणि यांच्यामुळे मी कोट्यधीश बनलो असल्याचं ते सांगतात, कामगारांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच माझ्यासाठी मोठा आनंद असल्याचं शेतमालक केळी उत्पादक शेतकरी रविंद्र पाटील यांनी सांगितलं.

खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी

या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी शेतकरी रविंद्र पाटील यांच्या उपक्रमाचं मोठ कौतुक केलं. एका शेतकऱ्याने शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांसाठी साजरा केलेला अनोखा उपक्रम म्हणजेच खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली, या उपक्रमाचा इतरही शेतकऱ्यांनीही आदर्श घ्यावा, असं मत कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित माजी आमदार आर.ओ.पाटील यांच्या कन्या आणि निर्मल सीडस् कंपनीच्या चेअरमन वैशाली सुर्यवंशी यांनी व्यक्‍त केलं.

संपूर्ण जिल्ह्यात या शेतकऱ्याची चर्चा

रविंद्र पाटील यांनी त्यांच्या शेतात राबणाऱ्या कामगारांसाठी राबवलेल्या या उपक्रमाची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा रंगली आहे. आपल्या शेतात राबणाऱ्या कामगारांमुळे कष्टामुळेच शेतात उत्पन्न मिळतं, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ कामगार म्हणून बघू नका, असा आदर्शही रविंद्र पाटील यांनी यातून सर्व शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. तर अडचणी येतात, त्यावर मात करत प्रत्येकाने रविंद्र पाटील यांच्यासारखेच सकारात्मक विचार ठेवले, तर प्रत्येक शेतकऱ्याला यश मिळेल, यात शंका नाही.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: